पेन्शन नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय..!

0
445

पालघर – योगेश चांदेकर :
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना १० लाख देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास मदत व्हावी यासाठी त्यांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. शिवाय अशा कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू नसल्यास त्याच्या कुटुंबाची भविष्यात मोठी आर्थिक ओढाताण होते. राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा १० वर्ष सेवा पूर्ण होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. तथापि, ही योजना फक्त राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असून ती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत लागू नव्हती. आता यासंदर्भात कमी सेवा कालावधी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अशा वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत होण्यासाठी ही योजना लागू करण्यात येत आहे. संबंधित कर्मचाऱ्याची नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसास ही मदत दिली जाईल. असे ही मुश्रीफ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here