पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील काही शिक्षक हे नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता जिल्ह्याच्या कामासाठी कार्यरत असल्याची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. शासनाने शिक्षकांचा शाळाबाह्य कामासाठी वापर न करण्याचे आदेश २०१० साली दिले असताना देखील जिल्ह्यातील काही शिक्षक त्याचे उल्लंघन करत असल्याचे समजल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेत त्या शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले. मात्र जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग यांनी आजवर शिक्षकांच्या पगारांविषयीचे महत्वपूर्ण काम अध्यापनासाठी नेमणूक असणाऱ्या शिक्षकावरच सोपविले होते. त्यामुळे वारभुवन यांनी आदेश दिल्यानंतर, तो शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर शिक्षकांच्या पगाराचे काम खोळंबले असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांना जून महिन्याचा पगार मिळण्यास विलंब होणार आहे असं दिसते आहे.
मे महिन्याचे कामाचे जून मध्ये देण्यात येणाऱ्या पगारास अप्रूव्हल करण्यास विलंब झाल्याने ते जूनअखेरीस मिळाल्याची माहिती काही शिक्षकांनी मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. तसेच जूनचे व्हावचर पुढे न पाठवल्याने जिल्ह्यातील शिक्षकांना जून महिन्याचा पगार मिळण्यास विलंब होणार अशी शक्यता आहे. याशिवाय पगाराचे काम हे अध्यापनाची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकावर सोपवल्याने विद्यार्थ्यांचे झालेल्या नुकसानीस कोण जबाबदार असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे. तसेच जिल्हा शिक्षण प्राथमिक अधिकारी यांनी कार्यालयातील कर्मचारी निवडून त्या कर्मचाऱ्यावर पगाराचा भार द्यावा म्हणजे शिक्षकांचा प्रश्न सुटेल अशीही मागणी होत आहे.. त्यामुळे यापुढे तरी कार्यालयीन कामकाजाचा भार शिक्षकांवर देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये हे अपेक्षित आहे. याबरोबरच सदर प्रकरणात त्या शिक्षकांवर अध्यापन बाह्य कामाची जबाबदारी कुणी दिली याची चौकशी होणे देखील गरजेचे आहे.