मुंबई : योगेश चांदेकर –
कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
राज्यभरामध्ये सध्या ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत बऱ्याच गोष्टी पुन्हा सुरु करण्यात आल्या असल्या तरी लॉक डाऊन पूर्णपणे शिथिल करण्यात आला नाही. अशातच सध्या लागू असलेला लॉक डाऊनच्या पाचव्या टप्प्याची मुदत ३० जून रोजी पूर्ण होत आहे. याच पार्श्ववभूमीवर ३० जूननंतर लॉक डाऊन पूर्णपणे उठवला जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, राज्यातील जनतेच्या मनामध्ये असलेल्या या प्रश्नाला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले असून त्यांनी, जर शिथीलता जीवघेणी ठरत आहे असं वाटलं तर आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो असा इशारा दिला आहे.