मुंबई (१३ मार्च) : यावर्षी लोकसभा निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील ४८मतदारसंघात ९६ हजार व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध करुन दिली जाणार असून त्यासाठी ६ लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे.
राज्यातील ९६ हजार मतदान केंद्रांवर ही मशीन वापरली जाणार आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांना तीन स्तरावर प्रशिक्षण दिले जात आहे. व्हीव्हीपॅट यंत्रणा ‘ईव्हीएम’ मशिनसाठी पुरक असून मतदान केल्याची पावती या यंत्रांच्या माध्यमातून मतदारास मिळणार आहे. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले, त्याची माहितीही व्हीव्हीपॅट मशिनवरील बटन दाबल्यानंतर मतदारास मिळणार आहे. त्यामुळे आपण केलेले मतदान त्याच उमेदवारास दिल्याची खात्री मतदारास पटण्यास मदत होणार आहे. मतदान केंद्रांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्रे बसविण्यात येणार असून मतदान केल्यानंतर७ सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळणार आहे. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराला त्याने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य होईल.
या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रथमच या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून व्हीव्हीपॅट मशिन वापराबद्दलच्या सूचना निवडणूक यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात विभागस्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर जाणाऱ्या सुमारे ६ लाख कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
महाराष्ट्रासाठी सुमारे १ लाख ३५ हजार व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध करुन देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे ९६ हजार यंत्रांचा वापर या निवडणुकीत केला जाणार आहे. तर अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रे झोनल अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
By mumbaienews.com