पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोर आल्याच्या अफवांचे पेव फुटल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिसणाऱ्या व्यक्तींना जमावाकडून बेदम मारहाण करण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात एकाच आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशा ३ धक्कादायक घटना घडल्या आहेत. याहल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत ३ निष्पापांचा बळी गेला आहे. त्यामुळे वाढत असणाऱ्या अफवांमुळे होत असलेले हल्ले रोखण्यासाठी पालघर पोलीसांनी कडक पावले उचलणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सोशल मीडियावर गावात, पाड्यावर चोर आल्याच्या अफवा पसरवू नये. कोणी संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्याच्यावर हल्ला न करता नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून त्याबाबत माहिती द्यावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये, संशयित इसमाला मारहाण केल्यास व त्या मारहाणीत जर संशयित इसमाचा मृत्यू झाला तर जमावास दोषी ठरवून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा(खुनाचा) गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.