मुंबई:
मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांची लुबाडणूक झाली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आणल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या ताकदीने एकहाती लढा सुरू केला होता. मुंबई ई न्यूज याप्रकरणी निर्भीड पत्रकारिता करत असल्याची प्रकल्प बाधित अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना खात्री पटली. त्यामुळे याला आता चळवळीचं स्वरूप प्राप्त होऊ पहात आहे. या लढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवणारे व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घटनात्मक अधिकार जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीचा 4 था स्तंभ म्हणून कार्य करणाऱ्या मुंबई ई न्यूजच्या पालघर विभागाचे संपादक योगेश चांदेकर व मुंबई ई न्यूजच्या पालघर विभागातील चमूचे हे यश आहे.
मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या काही निवडक लोकांमुळे बोथट झालेल्या लेखणीला आजही पत्रकारितेकडे एक व्रत म्हणून पाहणारा मोठा वर्ग जिवंत धार देऊन जिवंत ठेवतोय. समाजातील दीन दुबळ्यांचा, अन्यायग्रस्तांचा आवाज बनणारी लेखणी जर धनिकांची आश्रयीत झाली तर अनर्थ होईल. त्यामुळे पत्रकारांना जागता पहारा ठेवावा लागेल आणि त्याला मुंबई ई न्यूजचे पत्रकार जागत आहेत. न्यायाच्या मागणीसाठी लढणाऱ्या निर्भीड पत्रकाराविरुद्ध पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत.
खोट्या तक्रारींमुळे अन्यायग्रस्त शेतकरी घाबरेल अशी अपेक्षा कोण ठेवत असेल तर तो त्यांचा मोठा भ्रम ठरेल. उलटपक्षी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील अन्यायग्रस्त शेतकरी वर्ग जागृत होत आहे व तो खंबीरपणे दलालांविरोधात एल्गार करण्यासाठी एकजूट करत आहे हे सराहनीय आहे. मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांच्याविरोधात खोट्या तक्रारी दाखल होत असताना अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यांना या हक्काच्या लढाईत खंबीर साथ देण्याचं अभिववचन दिलं आहे. रिलायन्स पाईपलाईन बाधित अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी 7276644464 या क्रमांकावर संपर्क साधून अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यात याबद्दल आपल्या व्यथा मांडाव्यात जेणेकरून प्रकरणातील सत्य लवकर उजेडात येईल..!