पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्हापरिषदे अंतर्गत असणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षक संवर्ग बदल्यांना स्थगिती देत मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती निलेश सांबरे यांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रातून त्यांनी ही मागणी केली असून यामध्ये त्यांनी या नेमणुकीला का स्थिगिती दिली आहे याची कारणेही दिली आहेत. याबरोबरच सांबरे यांनी शिक्षक संवर्गाच्या बदल्यामागे होत असलेले राजकारण आणि आर्थिक व्यवहार यावरही बोट ठेवले आहे.
बदल्यांना स्थिगिती देण्यासाठी सांबरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे:
- याद्या दिनांक ९/८/२०२० रोजी रात्री ११.३० वाजता प्रसिध्द केल्या
- शिक्षकांना हरकती देण्यासाठी वेळ दिलेला नाही.
- २७/२/२०१७ च्या शासन निणंयानुसार संवर्ग निहाय याद्या नाहीत.
- सेवा जेष्ठतेचा मुद्दा विचारात घेतेलेला नाही.
- अवघड क्षेत्रात काम केलेल्यांना संवर्ग ४ मध्ये घेतले आहे
- संवर्ग १ चा शिक्षक श्री.विजय सावंत यांचे नाव संवर्ग ४ मध्ये घेतले आहे .
- महिला अवघडची यादी तयार करताना सेवा जेष्ठता न घेता वयानुसार घेतली आहे
- वसई तालुका ब्लॉक असताना त्या तालुक्याच्या मागणीसाठी अर्ज कसे स्विकारले
- इतर सर्व जिल्हयात संवर्ग निहाय याद्या एक आठवड्यापूर्वी तयार झाल्या आहेत
- गुजराथी माध्यमाच्या खाजगी आस्थापनातून आलेल्या शिक्षकांना वसई तालुका मागणीत समावेश आहे
- आज सकाळी याद्या बदलण्याबाबत गट शिक्षणाधिकारी यांचेकडून श्री.सलगर यांना फोन येत आहेत
हा सर्व गोंधळ करण्यामागे राजकीय पदाधिकारी आणि काही संघटनांचा हस्तक्षेप आहे. सुट्या असताना देखील काही राजकीय पदाधिकारी जिल्हापरिषदेत ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे यात मोठा आर्थिक व्यवहार असल्याचाही आरोपही शिक्षण सभापतींनी केला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकावर अन्याय न होता त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक पणे पार पाडली जावी, या याद्या फेरप्रसिध्द करून त्यावर आक्षेप नोंदवून योग्य सुधारणा करण्यासाठी लागणारा वेऴ आयुक्तांकडून घ्यावा अशी मागणीही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली असून तोपर्यंत झालेली बदलीची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.