मुंबई – योगेश चांदेकर
राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या २१५ वर पोहोचली असताना राज्यातले अनेक नेते, सेलिब्रिटी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुसऱ्यांदा राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘कोरोनाचं संकट गेल्यानंतर येणारा काळ आर्थिक आव्हानांचा असेल. त्यामुळे त्या काळात काटकसरीने वागणं, वायफळ खर्च टाळणं हे आपल्याला करावं लागेल’, असा इशारा दिला आहे. तसेच, लोकांनी घरातच थांबण्याचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.
या संकटातून घ्यावा लागेल हा बोध?
यावेळी आर्थिक शिस्तीचा धडा शरद पवारांनी लोकांना दिला. ‘आपण या संकटातून जे शिकलो, ते अनुभव इथून पुढच्या जीवनात देखील पाळावे लागतील. आपल्या सवयी बदलाव्या लागतील. आर्थिक संकट समोर उभं आहे. उत्पादन, व्यवसाय असं सगळं बंद आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर देखील होणार आहे. त्यामुळे आपण या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, याचा विचार करायला हवा. वैयक्तिक जीवनात काटकसरीने राहण्याची, वायफळ खर्च टाळण्याची सवय लावावी लागेल. ते केलं नाही, तर पुढचं आर्थिक संकट अधिक गंभीर असेल. विकासाचा दर २ टक्क्यांपर्यंत खाली येणार असेल, तर त्याचे परिणाम विकासावर गंभीर असतील’, असं शरद पवार म्हणाले.