MUMBAI e NEWS:
पालघर-योगेश चांदेकर
पालघर-वन हक्क अधिनयम 2006 अन्वये आदिवासींचा आणि अन्य पारंपरिक वन निवासी बांधवांचा वनाचा हक्क प्रस्थापित झाला खरा मात्र काही असंवेदनशील अधिकारी कायद्याचा धाक दाखवत आदिवासीना वनातून बेदखल करण्याचा प्रयत्न करताहेत. अशाच वाड्यातील वन अधिकाऱ्यांना आज श्रमजीवी संघटनेने चांगलाच धडा शिकवला, या अधिकाऱ्यांना कायद्यानेच उत्तर देत लेखी द्या अन्यथा मागण्या मान्य करा असा पावित्रा घेत तहसील कार्यालयात घेराव घालत अखेर लढा जिंकत श्रमजीवी ने उद्धवस्त होणाऱ्या आदिवासी बांधवांना दिलासा दिला.
स्वतःला कायदेतज्ञ समजणाऱ्या वन अधिकाऱ्यांना आम्ही 2006 च्या वन हक्क कायद्याचे धडे देत उत्तर दिले अशी प्रतिक्रिया यावेळी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी देत आदिवासींवरील वन अधिकाऱ्यांची मुजोरी सहन करणार नाही असा सज्जड दम भरला.
वाडा तालुक्यातील पिंगेमान आणि इतर काही आदिवासी पड्यांमध्ये अनेक आदिवासी बांधव परंपरागत शेती आणि निवास करत आहेत. वन हक्क अधिनियम 2006 मध्ये अगदी स्पष्ट पणे शेती आणि निवासाचा हक्क आदिवासी आणि अन्य पारंपरिक वन निवासींना मिळाला. मात्र वाड्यातील वन परिक्षेत्र अधिकारी त्यांचे वरीष्ठ उप वन संरक्षक मिश्रा यांच्या दबावाखाली आदिवासींना वन अधिनियम 1927 च्या कायद्याच्या तरतुदीचा धाक दाखवत त्रास देत होते. या आदिवासी बांधवांना शासनाच्या घरकुल योजना आणि विहिरींची योजना मंजूर आहे. या मंजुरीनंतर गट विकास अधिकाऱ्यांनी पाहिला हप्ता देखीक अदा केला. परिणामी लोकांनी जुने घर मोडून नवीन घराचे काम सुरू केले, विहिरींचे काम सुरू केले. आलेला पहिला हप्ता आणि कुठून उसनवारी करून कसे बसे काम सुरू केले तर वाडा पूर्व आणि पश्चिम चे परिक्षेत्र वन अधिकारी पी सी वडमारे आणि संभाजी पाटील या दोन्ही अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर आणि गटविकास अधिकारी वाडा यांना पत्र देत या योजना या वन निवासीना देऊ नये, तसे केल्यास त्यांच्यावर वन कायदा 1927 ची धमकी देऊन ही कामे बंद पाडली. परिणामी आदिवासींचे संसारच उघड्यावर उघड्यावर आले.
यानंतर संतप्त होत श्रमजीवी ने आज तहसिल कार्यालय वाडा येथे मोर्चाचे आयोजन केले. यात आलेल्या अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला। जर तुम्ही 1927 च्या वन कायद्याची धमकी देत आहात तर 2006 चा वन हक्क अधिनियम तुम्हाला मान्य नाही असे लेखी द्या असा आग्रह धरत या कायद्यातील तरतुदीच श्रमजीवीने अधिकाऱ्यांना वाचून दाखवत सर्वांचे लक्ष वेधत अधिकाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावली. लेखी उत्तर देण्याची ममागणी लावून धरली. लेखी मिळत नाही तोवर अधिकाऱ्यांना जाऊन देणार नाही असा आक्रमक पवित्रा श्रमजीवीने घेतल्याने वन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्याशी संपर्क साधत लेखी पत्र देण्याची तयारी दाखवली, परिक्षेत्र वन अधिकारी वाडा यांनी तहसीलदार उद्धव कदम यांच्या समक्ष लेखी देऊन वन हक्क प्लॉट धारकांच्या जागेत निवास आणि इतर वन संवर्धनाच्या योजना राबविण्यास हरकत नाही असे लेखी दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
यावेळी सरचिटणीस विजय जाधव, सुरेश पराड,रफिक चौधरी, मनोज काशीद, बाळू लाहंगे, रवी गरेल, यांसह संघटनेचे वड्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.