पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ऐना पाटील पाड्यातील जिल्हा परिषद शाळा इमारतीचे चक्क किराणा मालाचे गोडाऊन म्हणून वापर करण्यात आला होता. शाळे शेजारील एका किराणा दुकानदाराने चक्क 1200 ते 1300 किलो गुळ जिल्हा परिषद शाळेतच उतरवून घेतला होता. त्यामुळे दुकानदाराने चावी कुणाकडून घेतली याची तसेच शासकीय इमारतीचा असा गैरवापर झाल्याच्या चौकशीचा फार्स करण्यात आला होता.
ग्रामपंचायतची परवानगी घेणे सोडा या घटनेची कानोकान खबर सुद्धा कोणास लागू दिली नाही. शिक्षकाकडे असणारी चावी घेउन ग्रामपंचायत व गावातील इतर लोकांना न कळू देता हा प्रकार सुरू होता. याबाबत विचारले असता दुकानदाराने तो गुळ गरोदर महिलांना वाटण्यासाठी आणला होता असे उत्तर दिले खरे मात्र जर गावातील महिलांना गूळ दिलाच गेला नाही तर हा गुळ नेमका कुठे विरघळला हे एक कोडेच आहे. याप्रकरणी शिक्षकाला वाचवण्यासाठी खोटे अहवाल दाखल करण्यात आले आहेत, मात्र दुकानदार व शिक्षकाने शाळेत गूळ ठेवल्याचे सर्व पुरावे मुंबई ई न्यूजच्या हाती लागले आहेत.
शाळेच्या इमारतीचा असा वापर करणे कितपत योग्य आहे? यामुळे इमारतीचे काही गैरप्रकार होऊन अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदारी घेणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन असा गैरवापर होऊ नये यासाठी कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. गावातील काही लोकांकडून अर्थपूर्ण संबंध असल्याने शिक्षकाने चावी दिली असल्याचा आरोप करण्यात येतो आहे, त्यामुळे प्रशासनाने त्या गुळाच्या ढेपेला गोडवा असल्याने मुंगळा चिकटला आहे का याचा तपास करावा अशी मागणी जोर धरत आहे.