मुंबई – योगेश चांदेकर:
“राजसाहेब, महसूल निर्माण करता येईल आणि राज्याचे अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर आणता येईल परंतु महिलांच्या शापातून मिळणारा महसूल राज्य सरकारने लॉक डाऊनच्या परिस्थितीत घेऊच नये.” असं म्हणत भूमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेला आपला विरोध दर्शविला आहे.
एक महिना उलटून गेला महाराष्ट्रात दारूची दुकाने बंद आहेत, म्हणजे राज्यातील जनता व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. परंतु अचानक वाईन शॉप सुरू केले तर घरी जे काही साठवलेले, उरलेले पैसे आहेत ते दारूवर खर्च केले जातील. त्यामुळे गुन्हेगारी वाढेल आणि गरीब घरातील माणसं धान्य विकून दारू घ्यायला जातील. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते अशी भीती व्यक्त करत त्यांनी हा गंभीर मुद्दा निदर्शनास आणून दिला आहे.
त्यामुळे राज्याचा महसूल वाढला पाहिजे हे बरोबर आहे परंतु तो दारूतून नको, अनेक महिलांचा संसार या दारुमुळेच उध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारने दारूची दुकाने सुरू करूच नये अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्य आर्थिक अडचणींतून मार्ग काढत आहेत. महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना मार्चचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला होता. अशावेळी मद्यविक्रीबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.