पालघर – योगेश चांदेकर:
माहिमचे रेशनिंग धान्यदुकान ज्योती पटेल यांच्या नावाने असून कन्हैयालाल हे दुकान चालवत आहेत. धान्य देताना कोणालाही कुठलीही राशन घेतल्याची पक्की पावती दिली जात नाही व दादागिरी केली जाते. याबाबतची तक्रार निलेश म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. रेशनिंग का मिळत नाही याचा जाब विचारणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबतचे तथ्य तपासून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे धन्यवाटप होत नाही, काही लोकांना कमी प्रमाणात धान्य दिले जाते. कमी धान्य दिल्याचा जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. देश कोरोना सारख्या आपत्तीशी लढत असताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तीने असे वागणे हि गंभीर बाब असून असे प्रकार करणाऱ्यांवर जरब बसावी यासाठी कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
“धान्याच्या वितरणातील अनियमिततेबाबत मी जाब विचारण्यास गेलो असता मला उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच दमदाटी केली. हा प्रकार संतापजनक असून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा बसला पाहिजे.” – निलेश म्हाञे