पालघर-योगेश चांदेकर :
पालघर-श्रमजीवी संघटना आयोजित “निर्धार मोर्चा” ची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत सकारात्मक चर्चेची तयारी दाखवली आहे. त्यामुळे 25 तारखेला निघणारा मोर्चा हा नियोजित तारीख आणि वेळेत म्हणजे 25 फेब्रुवारी रोजीच निघणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेसाठी आमंत्रित केल्याप्रमाणे त्याच दिवशी त्याच श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ “मातोश्री” वर जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातच उशिरापर्यंत चालणाऱ्या मोर्चाचा त्याच दिवशी समारोप होईल असे चित्र आहे.
आदिवासींच्या हिताच्या आणि अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न सोडवणुकीसाठी श्रमजीवी संघटनेने “निर्धार मोर्चाचे” आयोजित केला आहे. हा मोर्चा मागण्या मार्गी लागेपर्यंत सुरू राहणार होता, सकारात्मक चर्चा न झाल्यास ठाण्यातून हा हजारो कष्टकरी बांधवांचा मोर्चा थेट मातोश्री वर धडकणार होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेसाठी आमंत्रण दिल्याने हा मोर्चा आता ठाण्यात निघणार असून त्याच दिवशी (ता.25) रोजी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा होणार असून त्याच दिवशी मोर्चाचा समारोप होणार असल्याचे संकेत संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी दिले आहेत.
अजून एक महत्त्वाचे म्हणजे यात आज एनआरसीच्या उसळलेल्या प्रश्नावर आज श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी प्रतिक्रिया दिली. जातीच्या दाखल्यावर,पडताळणीसाठी लादलेल्या जाचक अटी आणि पुरावे याबाबतचे नियम करून सरकारने आधीच आदिवासींवर एनआरसी लादले आहे असे पंडित यांनी सांगितले. आमचा या कायदा आणि सुधारणेला आमचा सरकट विरोध नसून जो पर्यंत पुरावे काय आणि केवळ कागदपत्राचे पुरावे नसून वस्तुनिष्ठ पुरावे काय आणि कसे ग्राह्य धरणार याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करायला हवी असे आमचे मत आहे असे पंडित सांगत आदिवासींच्या अस्तित्वावर लादलेल्या जाचक अटी लादल्या त्यासाठी कुणाला कोणत्या पक्षाला आंदोलन करावेसे नाही वाटले अशी खंत पंडित यांनी व्यक्त केली.
एनआरसीच्या जाचक अटीमुळे आदीवासी किंवा मुस्लीम समाजच नव्हे तर भटके,विमुक्त, पारधी आणि एकूणच निराक्षरतेच्या गर्तेत असलेल्या सर्वच जाती धर्माच्या लोकांना हा त्रास सहन करावा लागेल. निरक्षर गरीब, सामान्य लोकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा उचलत कुणी त्यांच्यावर अन्याय करत असेल, कायद्यामुळे जातीय तेढ आणि जनतेला त्रास होत असेल तर याविरोधातही संघटना आक्रमक राहील, आदिवासींच्या जगण्याचा, दोन वेळच्या पोटभर जेवणाचा, शिक्षण आरोग्याचा प्रश्न आमच्यासमोर आ वासून उभा आहे, हे आमचे प्राधान्य आहे, त्यासाठी लढणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे असे त्यांनी अधोरेखीत केले. 25 च्या मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी सभासदांना केले.