पालघर: ‘त्या’ कंपन्यांना अधिकाऱ्यांकडूनच अभय; एमआयडीसीची सुरक्षितता धोक्यात..!

0
463

पालघर – योगेश चांदेकर:

तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळातील अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचे सध्याच्या घडीला स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोणतीही पाहणी न करता या कंपन्यांना ‘कन्सेंट टू ऑपरेट’ची परवानगी दिली जात असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी घडलेल्या काही प्रकरणांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. याप्रकरणी मुंबई ई न्यूजचे विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी कंपन्यामधील परिस्थीची शहानिशा करून याबाबतची माहिती प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी होळकर यांना दिली होती. परंतु या अधिकाऱ्याने प्रकरण गांभिर्याने न घेता दुर्लक्ष केल्याचेच आत्तापर्यंतच्या घटनांमधून दिसून आले आहे.

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये अनेकवेळा गुढ अपघाती स्फोट होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तर शेकडो कामगार कायमस्वरूपी गंभीर जखमी झाले आहेत. असे असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मात्र कंपन्यांमधील परिस्थितीची पाहणी न करताच त्यांना ‘कन्सेंट टू ऑपरेट’चे प्रमाणपत्र देत असल्याचे उघड झाले आहे. हे प्रमाणपत्र देण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चाही यापूर्वी नागरिकांमध्ये सुरू होती. यामुळेच धोकादायक परिस्थितीत देखील केमिकल कंपन्यांना ही प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे बोलले जाते. 

याप्रकारची घटना २०१७ मध्ये एका राजकीय नेत्याच्या कंपनीला दिलेल्या ‘कन्सेंट टू ऑपरेट’ प्रमाणपत्रामुळे अगदी स्पष्टपणे उघड झाली होती. या कंपनीत उत्पादनासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक चिमणी, बॉयलर, रिएॅक्टर, चिलिंग हब, कॉलम या गोष्टीच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले होते. याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये कंपनीला भेट दिली असता कंपनीचे गेट बंद असल्याने पाहणी करता आली नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले. 

दरम्यान कंपनी प्रशासनाकडून कधी वाढीव क्षमतेसाठी कन्सेंट टू इस्टॅब्लिशमेंट तर कधी कन्सेंट टू ऑपरेटच्या नूतनीकरणासाठीही परवानगी मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना यानंतर देखील संबंधित अधिकाऱ्याने भेट देऊन पाहणी करणे गरजेचे असताना अद्याप भेट दिली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जर कंपनीची पाहणी न करताच अशी प्रमाणपत्रे दिली जात असतील तर ही खूप मोठी गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कंपन्यामधील सुरक्षिता रामभरोसेच असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर जर या कंपन्यांमध्ये काही उत्पादनच होत नसेल तर नेमक्या कोणत्या कारणाने या कंपन्या इथे आपले अस्तित्व राखून आहेत, कंपन्याच्या अंतर्गत भागात नेमके काय चालते, कुठल्या प्रकारच्या मालाची ने-आण केली जाते हे देखील तपासणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here