पालघर। योगेश चांदेकर। ट्रायबल कल्चरल सोसायटी, जमशेदपूर आयोजित जिल्हा स्तरावरील ज्योती फेलोशीप परीक्षेत केळवे येथील आदर्श विद्या मंदिर शाळेतील इयत्ता ७ वी तील कु. खुशी विकास हबाले आणि कु. सुरभी संजय भगत या दोन आदिवासी समाजातील विद्यार्थिनींनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती प्राप्त केली.
ट्रायबल कल्चरल सेंटर जमशेदपूरच्या सहाय्याने टाटा स्टिल मार्फत समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ह्या परिक्षेचं आयोजन केलं जातं. सदर परीक्षा प्रथमच पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. या आयोजनात ” टाटा स्टील ‘ कंपनी बोईसर शाखेचे कॉरपोरेट सोशल रिस्पाॅन्सीबिलिटिजचे प्रमुख टी. सत्यानंदन, समन्वयक कुणाल बारी, सदस्य राजेश वर्तक आणि संतोष राऊत यांचे मोलाचे योगदान लाभले.
पालघर जिल्ह्यातील एकूण २११ विद्यार्थी ज्योती फेलोशीप परिक्षेला बसले होते, त्यातील ११विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून त्यात ग्रामीण भागातील आदर्श विद्या मंदिर, केळवे शाळेतील दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना इ.१० वी पर्यत शैक्षणिक खर्चासाठी रोख रक्कम कंपनीतर्फे देण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी शाळेचे शिक्षक रविंद्र पाटकर यांनी मार्गदर्शन केले आहे.