पालघर – योगेश चांदेकर:
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील काही शिक्षक हे नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता जिल्ह्याच्या ठिकाणी शाळाबाह्य कामासाठी कार्यरत असल्याची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अशा शिक्षकांना तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अध्यापन बाह्य काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या नेमणुकीच्या शाळेत रुजू होण्याचे आदेश संबंधित तालुका स्तरावरून देण्यात आले आहेत अशी माहिती मुंबई ई न्यूजला मिळाली आहे.
- एकीकडे सर्व स्तरांतील मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी सरकार मोफत व सक्तीचे शिक्षण यांसारखे कायदे करत आहे तसेच अप्रगत मुलांच्यामध्ये प्रगती व्हावी यासाठी निरंतर काम करत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये नियुक्ती असणारे शिक्षक हे स्वतः अथवा कुण्या अधिकाऱ्याच्या आदेशाने शाळाबाह्य काम करत असतील तर हा प्रकार म्हणजे उलट्या घड्यावर पाणी असाच आहे म्हणावा लागेल.
वारभुवन यांनी अतिशय तत्परतेने अध्यापन बाह्य काम करत असलेल्या शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिल्याने विद्यार्थ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळले आहे. मात्र ते शिक्षक शाळा सोडून इतर ठिकाणी का कार्यरत होते? अध्यापन बाह्य कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी शिक्षकांचा वापर करण्यास स्वतः राज्य शासनाने मनाई केलेली असताना ते शिक्षक इतके दिवस कुणाच्या आदेशावरून तिकडे काम करत होते याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीस जबाबदार धरून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.