पालघर। (योगेश चांदेकर) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन करण्यात आलेल्या चार प्रवाशांना पालघर रेल्वेस्थानकावर गरीबरथ गाडीतून उतरवून रूग्णालयात दाखल करण्यात आलय. मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या गरीबरथ गाडीला पालघर येथे थांबा देऊन या चार प्रवाशांना उतरवण्यात आलं असून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डमध्ये नेण्यात आले.
या प्रवाशांच्या हातावर अलगीकरण केल्याचे छापे असल्याने तिकीट तपासनीसांनी त्यांना रेल्वेचा वापर करण्यास मज्जाव केला. पालघरच्या आरोग्य पथकाकडून तपासणी करून या प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी खाजगी वाहनातून पाठवण्याचा विचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. याबरोबरच डहाणू येथील कॉटेज रुग्णालयातदेखील एका व्यक्तीला विलगीकरण वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्व व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत.