मुंबई।
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (४ एप्रिल दुपारी २ वाजता) जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या एकीला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला असेल तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा दिला.
मी संयमाची भाषा वापरत आहे, विनंती करतोय, हात जोडतोय, जात-धर्म कोणताही असो कोरोना वायरस एकच आहे. मात्र समाजात दुही निर्माण करण्याचा, वायरस पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर कोविडपासून मी वाचवेन पण अशा वृत्तींना वाचवणार नाही. जाणीवपूर्वक चुकीचे व्हिडीओ पसरवू नका, त्यांची गय केली जाणार नाही असा दमही त्यांनी दिलाय.
या एका युद्धामध्ये मला एका गोष्टीचं समाधान आहे की, सर्वजण जातपात, पक्ष सर्व एका बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. सर्व पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. पंतप्रधान मोदी देखील चर्चा करत असतात, फोन करत असतात. आज सोनिया गांधी यांनीदेखील फोन केला. शरद पवारही सोबत आहेत. सर्व धर्माचे धर्मगुरुसुद्धा सोबत आहेत. काही मुल्ला-मौलवी माझ्या संपर्कात आहेत. अनेक संस्था, व्यक्ती, दिग्गज, कलाकार, खेळाडू आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पुढील सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणताही उत्सव, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा सोहळे होणार नाहीत. गुढीपाडवा, पंढरपूर वारी, रामनवमी घरी साजरे झाले, अन्य धर्मीयांनीही तसंच करावं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.