पालघर – योगेश चांदेकर:
आंबा म्हटलं की लहान मोठे सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. यंदा कोरोनाचे संकट उभे असल्याने देशभरात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे कोकणातल्या हापूस आंब्याची चव चाखायला तरी मिळेल का ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.. पण चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कोकण कृषी विभागाच्या पुढाकाराने थेट शेतक-यांकडूनच पालघरवासियांना आता आंबा पाठवला जात आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील शेतकऱ्यांकडून थेट आंबा विक्री करण्याचे नियोजित केले आहे. कृषी विभाग पालघर यांनी जे कर्मचारी शहरी भागात राहतात त्यांनी रहात असलेल्या सोसायट्यांमध्ये किंवा नातेवाईक यांच्याकडे जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी दिलेला आंबा थेट विक्री केल्यास ग्राहकांना स्वस्त दरात आंबा मिळू शकेल व शेतकऱ्यांना देखील मदत होईल यादृष्टीने नियोजन सुरु केले आहे.
पालघर तालुका कृषि अधिकारी व जिल्हा कृषि अधिकारी कार्यलयातील कर्मचारी व अधिकारी स्वतः जबाबदारी घेऊन आपआपल्या सोसायटी मध्ये जवळपास 100 ते 150 आंबा पेटीचे विक्री नियोजन केले आहे. संकटात अडकलेल्या शेतकरी बांधवाना मदत व्हावी यासाठी विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील साहेब यांच्या आदेशानुसार सर्वच कर्मचारी याबद्दल नियोजन करत आहेत अशी माहिती तालुका कृषी अधिकारी तरुण वैती यांनी दिली आहे.
पालघर तालुक्यातील नागरिकांना आंब्यांची थेट डिलिव्हरी हवी असल्यास त्यांनी 7875497008 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन तंत्रज्ञान व्यवस्थापक मनोज वाकळे यांनी केले आहे.