पालघर – योगेश चांदेकर:
तारापूर एमआयडीसी कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन मधून कोलवडे गावाच्या परिसरात हजारो लिटर लाल रंगाचे पाणी ओव्हरफ्लो होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारखान्यातील केमिकल युक्त पाणी CETP टॅंक मध्ये मोठ्या पाईपलाईन द्वारे नेण्यात येते. या पाइपलाइनवरील चेंबर मधून मोठ्याप्रमाणात केमिकलयुक्त पाणी बाहेर येत आहे. फेसाळलेलं केमिकलयुक्त पाणी बाहेर येत असल्याने नागरिक घाबरून गेले आहेत.
यासंपूर्ण प्रकाराकडे ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ’च्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे. ओव्हरफ्लो होणारे सदर केमिकलयुक्त पाणी शेजारील नाल्यामध्ये साचले जात असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे तसेच सांडपाण्याचे स्रोत यामध्ये केमिकल युक्त पाणी मिसळण्याची दाट शक्यता आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.